हिंगोलीतील जलसिंचनाची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत- खासदार हेमंत पाटील यांनी
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली मागणी
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील उच्च पातळी बंधारे , बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेला सहस्त्रकुंड जलविदुयत प्रकल्प आणि साठवण तलाव पूर्ण करून जिल्ह्यातील जलसिंचनाची कामे तात्काळ आणि प्राधान्याने पूर्ण करावीत अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी राज्याचे जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली. मंत्री जयंत पाटील नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना खासदार हेमंत पाटील यांच्यासह आ.बालाजी कल्याणकर यांनी नांदेड येथे आयोजित बैठकीत त्यांची भेट घेऊन जिल्ह्यातील विविध मागण्यांचे निवेदन देऊन मागण्या मंजूर करून घेतल्या. कयाधू नदीवरील खरबी येथील उच्च पातळी बंधाऱ्याचे पाणी लिफ्ट करून इसापूर धरणात टाकण्यात येऊ नये तर ते पाणी हिंगोली जिल्ह्यातच वापरण्यात यावे याकरिता खासदार हेमंत पाटील आग्रही भूमिका घेतली .
हिंगोली जिल्ह्याची सिंचन क्षमता अत्यल्प आहे, अनुशेष भरून काढण्यासाठी जिल्ह्यात उपसा सिंचन योजना मंजूर करणे गरजेचे आहे.मान्सून सुरवातीच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील उच्च पातळी बंधारे आणि प्रलंबित जलविदुयत प्रकल्प पूर्ण करून साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यास आगामी काळात याचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल याकरिता खासदार हेमंत पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. त्या अनुषंगाने राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे मराठवाडा दौऱ्यावर आले असता त्यांनी नांदेड येथे आयोजित केलेल्या बैठकीत खासदार हेमंत पाटील उपस्थित होते. यावेळी खासदार हेमंत पाटील यांच्यासोबत नांदेड उत्तर चे आमदार बालाजी कल्याणकर हे ही उपस्थित होते. यावेळी खासदार हेमंत पाटील यांनी मंत्री महोदयांना हिंगोली जिल्ह्यातील सिंचनाची परिस्थिती निदर्शनास आणून दिली.हिंगोली जिल्ह्यातील ऊर्ध्व पैनगंगा , येलदरी आणि सिद्धेश्वर हे मोठे प्रकल्प आहेत परंतू याचा लाभ जिल्ह्यास मिळत नाही.त्यामुळेच या प्रकल्पावर उपसा सिंचन योजना मंजूर करण्यात यावी आणि हिंगोली जिल्ह्यातील आणि मतदारसंघातील जलसिंचनाची कामे प्राधान्याने पूर्ण करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पावरील उच्च पातळी बंधारे , कळमनुरी तालुक्यातील सापळी धरणाऐवजी नांदापूर,सालेगाव, डिग्रस, कोंढूर आणि कसबे धावंडा हे उच्च पातळीचे साखळी बंधारे मंजूर करावेत.कौठा तांडा ता. हिमायतनगर - सहस्त्रकुंड ता.किनवट येथील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला बहुद्देशीय जलविदुयत प्रकल्प तात्काळ सुरू करण्यात यावा.तसेच हिंगोली लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील पांगरा ,साप्ती, गोजेगाव,बनचिंचोली, तर हिमायतनगर मधील घारापूर आणि किनवट तालुक्यातील माळेगाव या सहा उच्च पातळी बांधणाऱ्या मंजूरी देण्यात यावी, पूर्णा प्रकल्पांतर्गत पूर्णा सिद्धेश्वर धरणाखाली पूर्णा नदीवर औंढा तालुक्यातील पोटा, वसमत तालुक्यातील जोड परळी, पिंपळगाव कुटे आणि परभणी जिल्ह्यातील ममदापुर येथे चार उच्च पातळी बंधारे बांधण्यात यावेत.तसेच हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस आणि सेनगाव तालुक्यातील सुकळी येथील साठवण तलावांना प्रशासकीय मान्यता देण्यात यावी. यासह वसमत तालुक्यातील पिंपळखुटा व बोराळा येथील साठवण तलावाची कामे तात्काळ सुरू करण्यात यावीत.हिंगोलीच्या लघु पाटबंधारे विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी .आणि हिंगोली जिल्ह्यातील आणि नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शंकरराव चव्हाण विष्णुपरी प्रकल्प मुख्य कालव्यावरील व वितरिके वरील देखभाल व दुरुस्तीची कामे तात्काळ हाती घ्यावीत तसेच माहूर तालुक्यातील धनोडा उच्च पातळी बंधाऱ्यास मंजूरी द्यावी यासह विविध मागण्यांचे निवेदन खासदार हेमंत पाटील यांनी मंत्री महोदयांना देऊन मागण्या मंजूर करून घेतल्या.तसेच कयाधू नदीवरील खरबी येथील उच्च पातळी बंधाऱ्याचे पाणी लिफ्ट करून इसापूर धरणात टाकण्यात येऊ नये तर ते पाणी हिंगोली जिल्ह्यातच वापरण्यात यावे याबाबत खासदार हेमंत पाटील आग्रह धरला.
टिप्पणी पोस्ट करा