सोयाबीनच्या प्रमाणित बियाणे वाटपामध्ये महाबीज यंत्रणा आणि कृषी विभागाकडून कोणताही घोटाळा नसल्याचा खुलासा

सोयाबीनच्या प्रमाणित बियाणे वाटपामध्ये महाबीज यंत्रणा आणि कृषी विभागाकडून कोणताही घोटाळा नसल्याचा खुलासा

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
11 जून 2025 
हिंगोली  राष्ट्रीय खाद्यतेल अभियान गळीतधान्य अंतर्गत हिंगोली जिल्ह्यात खरीप हंगाम 2025 मध्ये सोयाबीन पिकाचे समुह निवडण्यात आलेले आहेत. त्यासाठी सोयाबीन पिकाचे पाच वर्षाच्या आतील बियाण्याचे १०० टक्के अनुदानावर कमीत-कमी ०.२० हेक्टर ते १ हेक्टर क्षेत्रासाठी लागणारे बियाणे वाटपाचा कार्यक्रम चालू असून त्यासाठी नोंदणी केलेल्या पात्र लाभार्थ्यांना जास्तीत जास्त ७५ किलो बियाणे मंजूर असल्याचे कृषि आयुक्तालय, पुणे यांच्या नोंदणीकृत प्राप्त लाभार्थ्यांना सूचना प्राप्त आहेत, त्यासाठी महाबीज यंत्रणेकडून २२ किलो प्रती बॅग पॅकींग असलेले बियाणे देण्यात येत आहे. सोयाबीनची पेरणी बीबीएफ टोकन तंत्रज्ञानाव्दारे केल्यास उत्पादनामध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे.  त्यासाठी प्रती एकरी २२ किलो बियाणे पुरेसे असते या उद्देशाने महाबीज यंत्रणेकडून २२ किलो प्रती बॅग बियाणे पॅकींग करण्यात आली आहे. तथापि, लाभार्थ्यांना ७५ किलो बियाणे मंजूर झाले असल्यास २२ किलो पॅकींगमध्ये ७५ किलो बियाणे देणे शक्य होत नाही आणि प्रमाणित बियाणे असल्याने ते बॅग फोडून देता येत नाही. म्हणून २२ किलोच्या तीन बॅगा म्हणजे ६६ किलो बियाणे देण्याचे निश्चित करण्यात आले होते, जर शेतकऱ्यांना ७५ किलो बियाणे पाहिजे असल्यास त्यांनी ८८ किलो बियाणे घेऊन ७५ किलो बियाणे अनुदानित व उर्वरीत १३ किलो बियाणे विना अनुदानित स्वखर्चाने घ्यावे लागेल.

संबंधित प्रमाणित बियाणे वाटपामध्ये महाबीज यंत्रणेकडून आणि कृषी विभागाकडून कोणताही घोटाळा नसून सर्व शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी आणि वरीलप्रमाणे बियाणे खरेदी करावे. शासकीय अनुदानित बियाण्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन राजेंद्र कदम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने