चोरीच्या ७ शेळ्यांसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त; तिघे जेरबंद
पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांच्या पथकाची धडक कारवाई
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
१९ जुलै 2026
औंढा नागनाथ :
जवळा बाजार पोलिसांनी आठवडी बाजार परिसरात धडक कारवाई करत चोरीच्या सात शेळ्यांची विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना अटक केली. आरोपींकडून सात शेळ्या, एक चारचाकी वाहन आणि तीन मोबाईल असा सुमारे ३ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्राथमिक चौकशीत आरोपींनी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड येथून शेळ्या चोरल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत पोलीस निरीक्षक शामकुमार (एस. पी.) डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे, हेड कॉन्स्टेबल राजेश ठाकूर, दिलीप नाईक, विष्णु चव्हाण, वसंत चव्हाण आणि दिनकर पोले यांच्या पथकाने आठवडी बाजार परिसरात गस्त घालत असताना गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली.
बाजारात विक्रीसाठी आणलेल्या सात शेळ्यांबाबत संशय आल्याने पोलिसांनी संबंधितांची चौकशी केली. आरोपींनी शेळ्या वाहनातून आणल्याचे सांगितले; मात्र त्यांच्या मालकीचे कोणतेही वैध कागदपत्र किंवा समाधानकारक स्पष्टीकरण सादर करता आले नाही. जबाबात विसंगती आढळल्याने पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली.
पंचासमक्ष जप्ती पंचनामा करून सात शेळ्या, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले चारचाकी वाहन आणि तीन मोबाईल असा एकूण साडेतीन लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणात अजय सुभाष पवार (वय १९, रा. बोरी, ता. जिंतूर, जि. परभणी), कार्तिक सुभाष पवार (वय २०, रा. दुसरबीड, ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा) आणि आदित्य सुभाष भोसले (वय २१, मूळ रा. डोणगाव, ता. मेहकर, जि. बुलढाणा, सध्या रा. दुसरबीड, ता. सिंदखेडराजा) यांना अटक करण्यात आली आहे.
प्राथमिक चौकशीत आरोपींनी दुसरबीड येथून शेळ्या चोरल्याची कबुली दिली असून, या टोळीने यापूर्वीही पशुधन चोरीचे गुन्हे केले आहेत का, तसेच या गुन्ह्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा जवळा बाजार पोलीस सखोल तपास करत आहेत.
पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यात मालमत्तेविषयक गुन्ह्यांविरोधात सुरू केलेल्या विशेष मोहिमेतील ही महत्त्वाची कारवाई मानली जात आहे. या कारवाईमुळे पशुधन चोरी करणाऱ्या टोळ्यांमध्ये खळबळ उडाली असून, अशा गुन्ह्यांवर प्रभावी आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.
टिप्पणी पोस्ट करा