थकित दोन कोटींच्या दंड वसुलीसाठी वाहतूक शाखेची धरपकड मोहीम, शहरात सर्व वाहनांची तपासणी सुरू
हिंगोली/- प्रतिनिधी
हिंगोली शहरासह जिल्ह्यातील वाहनांवर ऑनलाइन दंडात्मक कारवाई केल्यानंतरही तब्बल दोन कोटी रुपयांचा दंड भरण्यात आलाच नाही, त्यामुळे गुरुवारी ता. 3 सकाळपासून शहर वाहतूक शाखेने हिंगोली शहरात वाहनांची धरपकड मोहीम सुरू केली आहे. दिवसभरात 400 वाहनांवर वर केलेल्या कारवाईत अडीच लाखाचा दंड वसूल झाला आहे.
हिंगोली शहरासह जिल्ह्यात व्यवस्थेला वळण लावण्यासाठी पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलिस तसेच वाहतूक शाखेने मागील काही दिवसात वाहनांवर कारवाईची मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेमध्ये वाहनांची नोंदणी नसणे, वाहन चालविण्याचा परवाना नसणे, फॅन्सी नंबर प्लेट यासह विविध कारणांवरून वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. सदर दंडात्मक कारवाईची ऑनलाईन माहिती देखील वाहनचालकांच्या भ्रमणध्वनीवर तसेच ई-मेल वर पाठवण्यात आली आहे. मात्र, दंडात्मक कारवाईची नोटीस देऊन देखील तब्बल दोन कोटी रुपयांचा दंड अद्यापही भरण्यात आलाच नाही.
या प्रकारानंतर आज हिंगोली शहरात वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अखिल सय्यद, जमादार शेषराव राठोड, गजानन राठोड, फुलाजी सावळे, शिवाजी पारीसकर, रुपेश धाबे, किरण चव्हाण, अमित मोडक, सुभाष घुगे, रमेश ठोके यांच्यासह पथकाने आज सकाळपासूनच हिंगोली शहरात वाहन तपासणीची मोहीम सुरू केली होती. या मोहिमेमध्ये दुचाकी, तीनचाकी व चार चाकी वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये दोन पेक्षा अधिक वेळेस दंडात्मक कारवाई होऊनही दंड न भरलेली वाहने ताब्यात घेऊन दंड वसूल केला जात आहे. सायंकाळी उशिरापर्यंत सुमारे चारशे वाहनांवर कारवाई करून अडीच लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
إرسال تعليق