माळहिवरा येथील उड्डाणपूल व चौकाला महान सम्राट अशोक यांचे नाव
बुद्ध जयंती निमीत्त थाटात कार्यक्रम
हिंगोली- तथागत बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त हिंगोली- वाशिम रस्त्यावरील माळहिवरा येथील उड्डाणपुल व चौकाला महान सम्राट अशोक यांचे नाव देण्यात आले. तसेच वारंगा फाटा ते अकोला या राष्ट्रीय महामार्गाला सुद्धा सम्राट अशोक यांचेच नाव देण्यात आले असून शासकीय पातळीवर हेच नाव कायम ठेवण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे.
माळहिवरा येथील 161 क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावरील चौकाला आणि उड्डाणपुलाला महान सम्राट अशोक यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी आंबेडकरवादी तरुणांनी केली होती. आज बुद्ध जयंती निमीत्त चौक व उड्डाणपुलाचा नामकरण कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहुजन मजूर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. रावण धाबे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. अभिजित खंडारे, ॲड. नागेश अंभोरे यांची उपस्थीती होती.
तर युवानेते नरेश रसाळ, मेहबूबभाई शेख, बंडू मानकर, पंकज घुगे, सचिन रसाळ, राहुल खंदारे, मिलिंद पठाडे, महेंद्र रसाळ, आकाश काहाळे, देवानंद साठे, लखन सरतापे, संदीप भोकरे, रवी गायकवाड, धम्मपाल कांबळे, रवी रसाळ, गजानन रसाळ आदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना ॲड. रावण धाबे यांनी सांगितले की, महामार्ग क्रमांक 161 ला महान सम्राट यांचे नाव आज देण्यात आले आहे. मात्र शासकीय पातळीवर सुद्धा हेच नाव कायम राहावे यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठपुरावा करण्यात येईल. हा रस्ता तेलंगणातील संगारेड्डी ते महाराष्ट्र राज्यातील अकोला या दरम्यान असून त्याची लांबी सुमारे 430 किमी एवढी आहे. मुंबई ते नागपूर दरम्यानच्या समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे. याच धर्तीवर या राष्ट्रीय महामार्गाला महान सम्राट अशोक यांचे नाव देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे.
यावेळी उड्डाणपूलावर भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून राष्ट्रीय महामार्गावरील चौकाला आणि उड्डाणपुलाला देण्यात आलेल्या महान सम्राट अशोक यांच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. तसेच त्यानंतर माळहिवरा येथील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांसह साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, संत रविदास महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
إرسال تعليق