गणेशवाडीत अतिक्रमणावर पालिकाचा हातोडा; काही दिवसांतच रस्त्याच्या कामाला सुरुवात
महाराष्ट्र 24 न्यूज
नेटवर्क16 ऑक्टोंबर 2022
हिंगोली
शहरातील गणेशवाडी भागात रस्त्याच्या कामात अडथळा असलेल्या अतिक्रमणांवर पालिका प्रशासनाच्या पथकाने शनिवार दि.१५ ऑक्टोबर रोजी सकाळी हातोडा मारला आहे. जेसीबीच्या मदतीने या ठिकाणी असलेले अतिक्रमण जमीनदोस्त केले जात असून पुढील काही दिवसांतच रस्त्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे.
हिंगोली पालिकेला नागरी भागात पायाभूत सुविधा उपलब्ध करणे या योजनेमध्ये पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून गणेशवाडीभागात हनुमान मंदिर पासून या रस्त्याचे काम मंजूर करण्यात आले आहे. १२ मिटर अंतराच्या या रस्त्याचे पालिकेकडून मोजमापही घेण्यात आले होते. यामध्ये अनेक नागरिकांनी रस्त्यावरच अतिक्रमण करून पक्की बांधकामे केल्याचे आढळून आले होते.
यामुळे पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी अतिक्रमणधारकांना एक महिन्यापूर्वी अतिक्रमण काढून घेण्याबाबत नोटीस दिल्या होत्या. मात्र, अतिक्रमधारकांनी मुदतीमध्ये अतिक्रमण काढलेच नाही. त्यामुळे शनिवारी मुख्याधिकारी अरविंद मुंडे, नगर अभियंता रत्नाकर अडशिरे, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर यांच्यासह कर्मचार्यांच्या पथकाने गणेशवाडी भागात पाहणी केली. त्यानंतर तातडीने जेबीसी व पोलिस पथक बोलावून अतिक्रमण हटविण्यास सुरवात केली आहे. या अतिक्रमणामध्ये ५ पक्की बांधकामे असून ४ टीनपत्राचे शेड आहे. तसेच इतर कच्ची बांधकामे आहेत. या सर्व अतिक्रमणांवर पालिकेने हातोडा चालविला आहे.
दरम्यान, या मोहिमेमुळे गणेशवाडी भागातील रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. पुढील काही दिवसातच या ठिकाणी अतिक्रमण काढल्यानंतर रस्त्याच्या कामाला सुरवात केली जाणार आहे. या रस्त्यामुळे गणेशवाडी भागातील नागरीकांचा वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
हिंगोली शहरात तत्कालीन मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी अनेक ठिकाणी अतिक्रम हटवून शहराचा श्वास मोकळा केला. त्यानंतर आता नव्याने रुजू झालेल्या मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत अतिक्रमणावर हातोडा मारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शहरातील अतिक्रमणे जमीनदोस्त होणार आहेत.
إرسال تعليق