![]() |
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी |
खबरदारी घेवून दिपावली साजरी करण्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे आवाहन
हिंगोली, दि. 10 नोव्हेंबर :- जागतिक आरोग्य संघटनेने कोव्हिड (COVID-19) या विषाणूमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य म्हणून घोषित केलेला आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रसार भारतात, महाराष्ट्रातील शहरात गतीने प्रसारीत होत आहे. नुकतेच हिंगोली शहरातही कोव्हिड-19 चे संसर्ग बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. तसेच राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथीचा रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 हा दि. 13 मार्च, 2020 पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित करुन त्याबाबतची नियमावली तयार करण्यात आलेली आहे. तसेच शासनाने दि. 17 जुलै, 2020 रोजीच्या शासन परिपत्रकान्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत.
कोव्हिड-19 मुळे उध्दभलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीची दिपावली साध्या पध्दतीने साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना विहित करण्यात आलेल्या आहेत.
1) राज्यात तसेच मोठ्या शहरांमध्ये अद्यापही कोरोनाचे रुग्ण मोठया प्रमाणावर आढळुन येत आहेत. चालू वर्षी कोविड या संसर्गजन्य रोगाचा झालेला प्रादुर्भाव विचारात घेऊन गेल्या सात-आठ महिन्यात आलेले सर्वधर्मीय सण, उत्सव अत्यंत साध्या पध्दतीने व लोकांनी एकत्रित न येता साजरे केले आहेत. या वर्षीचा दिपावली उत्सव कोविड कालावधीत साजऱ्या केलेल्या अन्य उत्सवांप्रमाणे पूर्ण खबरदारी घेऊन अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करावा.
2) कोविड संसर्गामुळे बंद करण्यात आलेली राज्यातील धार्मिक स्थळे अद्याप खुली करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे साजरा केला जाणारा दिपावली उत्सव घरगुती स्वरुपात मर्यादित राहील यांची दक्षता घेण्यात यावी. उत्सव कालावधीत नागरिकांनी विशेष करुन ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालके यांनी घराबाहेर पडण्याचे शक्यतो टाळावे. तसेच नागरिकांनी गर्दी टाळावी व मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊ नये, मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे, जेणेकरुन कोरोनाचा संसर्ग, संक्रमण वाढणार नाही.
3) दिपावली हा दिव्यांचा तसेच प्रकाशाचा उत्सव मानला जातो. या उत्सवादरम्यान दरवर्षी मोठया प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. त्यामुळे वायु व ध्वनीप्रदुषंणाची पातळी वाढून जनसामान्यांच्या तसेच प्राणीमात्रांच्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम दिपावली उत्सवानंतर बराच कालावधीपर्यत दिसून येतात. कोरोना आजारामुळे परिणाम झालेल्या अनेकांना फटाक्यांच्या धुरामुळे वायु प्रदुषणाचा थेट परिणाम होऊन त्रास होण्याची भीती आहे. ही बाब विचारात घेऊन नागरिकांनी चालू वर्षी फटाके फोडण्याचे टाळावे, त्याचा त्रास होऊ शकतो. त्या ऐवजी दिव्यांची आरास मोठया प्रमाणावर करुन उत्सव साजरा करावा.
4) या उत्सवादरम्यान कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक उपक्रम, कार्यक्रम उदा. दिपावली पहाट आयोजित करण्यात येऊ नयेत. आयोजित करावयाचे झाल्यास ऑनलाईन, केबल नेटवर्क, फेसबूक इत्यादी माध्यमांव्दारे त्यांचे प्रसारण करावे.
5) सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम, शिबीरे (उदा.रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याव्दारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी. मात्र त्या ठिकाणी देखील लोकांनी एकाच वेळी मोठया प्रमाणावर एकत्रित येऊ नये.
6) कोव्हिड-19 या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस , स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.
कोव्हीड 19 विषाणूचा प्रसार रोखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपण सर्वानी यासाठी सहकार्य केल्यास रोगाचा प्रसार रोखण्यास फार मोठी मदत होणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी वरील मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन दिपावली सण साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.
उत्तर द्याफॉरवर्ड करा |
إرسال تعليق