हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन शेतकरी प्रशिक्षण संपन्न…

हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन शेतकरी प्रशिक्षण  संपन्न 
 
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
30 नोव्हेंबर 2024 
मा ‌ बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र वसमतच्या माध्यमातून हळद उत्पादक शेतकऱ्यांना हळदीच्या विविध वाढीच्या अवस्थेत मार्गदर्शन करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून केंद्राचे अध्यक्ष मा.ना. श्री हेमंत पाटील यांच्या संकल्पनेतून व व्यवस्थापकीय संचालक तथा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी हिंगोली श्री राजेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि.३०.११.२०२४ रोजी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. खरीप हंगाम २०२४ मध्ये लागवड केलेल्या हळदीला आता साधारणत: ५ ते ६ महिन्याचा कालावधी झाला असून यावर्षीच्या वातावरणात अधिकच्या पावसामुळे तसेच ज्या ठिकाणी हळद बेल्ट आहे अशा ठिकाणी करपा, कंदकुज या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत असल्याने या रोगाचे व्यवस्थापन करण्यासाठी “सद्यस्थितीत हळद पीक व्यवस्थापन” या विषयावर प्रा.डॉ.श्री अनिल ओळंबे ,कृषी विज्ञान केंद्र, तोंडापूर यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. हळद पिकाच्या संपूर्ण वाढीच्या अवस्थेत संशोधन केंद्राच्या वतीने विविध तज्ञ शास्त्रज्ञांना आमंत्रित करून हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात येते. तसेच या प्रशिक्षणाचे युट्युब आणि फेसबुक या माध्यमाद्वारे सुद्धा शेतकरी बांधवांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येते. 
आज या कार्यक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्र तोंडापूरचे डॉ.अनिल ओळंबे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यवस्थापकीय संचालक श्री राजेन्द्र कदम यांनी केले आणि हिंगोली व परिसरातील जिल्ह्यात हळदीवर करपा, कंदकुज या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसत असल्यामुळे या रोगाचे व्यवस्थापन करण्यासाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आल्याचे सांगितले. मा.बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या वतीने यावर्षी संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर विविध ४४ हळदीच्या वाणांची लागवड करण्यात आलेली असून या वाणांची पाहणी करण्यासाठी हळद उत्पादक शेतकऱ्यांनी भेटी द्याव्यात असे आवाहन केले. याप्रसंगी त्यांनी राज्यभरातून आणलेल्या विविध हळद वाणांचे पीक उत्पादनाची अवस्था काय आहे व या भागात कुठल्या वाणाची लागवड यशस्वी होऊ शकते या उद्देशाने केंद्रावर विविध वानांची प्रात्यक्षिके घेण्यात आल्याचे सांगितले.हळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रस येथील हळदीचा फुले स्वरूपा वाण संशोधन केंद्राच्या वतीने शेतकऱ्यांना यावर्षी वितरित करण्यात आला या वाणाची पिक परिस्थिती सध्या  चांगली असल्याने भविष्यात या वानाची लागवड या भागात मोठ्या प्रमाणावर होऊ शकते असे सांगितले. 
हळद उत्पादक पट्ट्यांमध्ये यावर्षी करपा व कंदकुज या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आल्यामुळे या रोगाचे व्यवस्थापन करण्यासाठी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, आत्मा यांचे मार्फत याबाबतीत सखोल मार्गदर्शन करण्यात येत आहे.
प्रा.डॉ.श्री अनिल ओळंबे यांनी करपा व कंदकुज या रोगाचे व्यवस्थापन करण्यासाठी सुरुवातीपासून घ्यावयाच्या काळजीबाबत सखोल मार्गदर्शन केले. पिकाची लागवड करताना रोगमुक्त, कंदकुज कंदमाशी विरहित बेण्याचा वापर करण्यावर त्यांनी भर दिला. पावसाचे पाणी साचून राहणार नाही याबाबत काळजी घेण्याचे सांगितले. पिकाला पाणी  गरजेनुसार द्यावे.  खतांचा संतुलित वापर करावा रासायनिक खताबरोबर शेणखत, हिरवळीचे खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर करावा, हळदीच्या पिकाची फेरपालट करावी एकाच शेतात दरवर्षी हे पीक घेऊ नये या सह रोगाचे व्यवस्थापन करण्यासाठी रासायनिक तसेच जैविक निविष्ठा वापरून व्यवस्थापन करण्यावर त्यांनी भर दिला. ज्या ठिकाणी कंदकुज या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे अशा भागात ब्लू कॉपर किंवा मॅंकोझेब किंवा बाविस्टीन या बुरशीनाशकाची  जर प्रादुर्भाव अधिक असेल तर रेडीमेड गोल्ड यांसारख्या संयुक्त बुरशीनाशकांची आळवणी करावी. प्रादुर्भाव कमी प्रमाणात असेल तर अशा ठिकाणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीने विकसित केलेले बायोमिक्स या जैविक बुरशीनाशकाचा किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडी या बुरशीनाशकाची आळवणी करण्याबाबत मार्गदर्शन केले. पिकावर करपा असेल तर करपा रोगाचे नियंत्रण करण्यासाठी जर करपा कमी प्रमाणात असेल तर ह्या पिकावर बायोमिक्स, ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकांची फवारणी घेता येईल प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असल्यास ब्लू कॉपर किंवा मॅंकोझेब किंवा बाविस्टीन किंवा संयुक्त बुरशीनाशक अमिस्टर टॉप अशा रासायनिक बुरशीनाशकांची फवारणी करण्याबाबत मार्गदर्शन केले.
हळदीवर हळदीचे पीक घेऊ नये, उच्च दर्जाचे बेणे लागवडीसाठी वापरावे लागवडी पूर्वी बेणे प्रक्रिया करावी तसेच संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे, पिकात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी, सिंचनासाठी पाणी देताना सुद्धा अति पाणी होणार नाही याची काळजी घ्यावी असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन तंत्र अधिकारी श्री रमेश देशमुख यांनी केले.

Post a Comment

أحدث أقدم