ज्योतीपाल रणवीर यांची वंचित बहुजन आघाडीच्या हिंगोली जिल्हा महासचिवपदी निवड
महाराष्ट्र24 न्यूज नेटवर्क
हिंगोली, प्रतिनिधी : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हिंगोली जिल्ह्यातील (हिंगोली, कळमनुरी, सेनगाव तालुके) नव्या कार्यकारिणीची घोषणा 27 मार्च 2026 रोजी करण्यात आली. या कार्यकारिणीत ज्योतीपाल भिमराव रणवीर यांची जिल्हा महासचिवपदी निवड करण्यात आली आहे.
ज्योतीपाल रणवीर हे पक्षाच्या संघटनात्मक कामात सक्रिय राहिले असून, त्यांनी विविध स्तरावर पक्षवाढीसाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या कामाची दखल घेत पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर महासचिवपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या निवडीमुळे हिंगोली जिल्ह्यात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणीत शिवाजी कानबाराव खरात यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तसेच उपाध्यक्षपदी प्रकाश महाडू राऊत व अंबादास सुकाजी गाडे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटक म्हणून रामेश्वर राघोजी भालेराव यांच्यावर जबाबदारी देण्यात आली असून, कोषाध्यक्षपदी माधव शिवाजीराव सपाटे यांची निवड करण्यात आली आहे. प्रसिद्धी प्रमुख म्हणून कैलास मुंजाजी भुजंगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सचिवपदी राम माणिकराव पवार, मारोती अशोकराव पंडित, शेख गणी शेख मोहम्मद, सिद्धांत प्रभाकरराव गायकवाड, शेख जाकीर शेख मोईन, गौतम महादेव थोरात आणि विनोद नानाराव नाईक यांची निवड करण्यात आली आहे.
ही नव्याने जाहीर करण्यात आलेली कार्यकारिणी हिंगोली जिल्ह्यात पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी तसेच आगामी राजकीय धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.
ही माहिती पक्षाचे महासचिव किसन चव्हाण यांनी दिली.
إرسال تعليق